Tuesday, January 11, 2011

अस्तित्व


सकाळचे साडे आठ वाजले होते. मनोहरने घडयाळात पाहिलं आणि तो ताडकन उठला. अरे बाप रे! सॉलिड उशीर झाला की आज. सकाळी सकाळी मीटींग होती. चुकणार च्यायला आता.

"मनाली ए मनाली, उठवलं का नाहीस मला. काल सांगितलं होतं ना की लवकर जायचयं," मनोहरच्या त्राग्याला पलीकडून काहीच उत्तर आलं नाही. म्हणजे मनाली ऑफिसला निघून गेली होती. भांडण तर झालं नव्हतं काल मग अशी कशी निघून गेली मला न उठवताच? पण मनोहरला यापेक्षा जास्त विचार करायला वेळ नव्हता. ताबडतोब निघणं आवश्यक होतं नाहीतर बॉसकडून चांगली हजेरी घेतली जाणार होती.

त्याने भराभर तोंड धुतलं, कपडे बदलले आणि सरळ दरवाज्याच्या दिशेने धाव ठोकली. गाडी भरधाव सोडून कसाबसा मनोहर एकदाचा ऑफिसला पोहचला. मीटींगला खात्रीने उशीर झाला होता पण जितकं पदरात पडेल तितकं घ्याव या विचारात त्याने ऑफिसमधे प्रवेश केला.

"हाय जेनी,"
जेनी म्हणजे रिसेप्शनीस्ट. हसतमुख आणि बोलभांड. आल्या गेल्याची इत्यंभूत माहिती ठेवणार. आज मात्र जेनीने मान वर करुन सुद्धा पाहिलं नाही. मनोहरला तरी थांबायला वेळ कुठे होता. तो ताड ताड कॉन्फरन्स रुमच्या दिशेने गेला आणि सरळ आत घुसला. मीटींग अर्ध्यावर आली होती. सगळेजण इतके बिझी होते की मनोहरच्या येण्याची दखलही कोणी घेतली नाही. साधं हाय, हलो पण नाही. मनोहरने मधेच आपलं तोंड खुपसलं पण काही फरक नाही, जसे काही आज त्याचे सर्व गुन्हे माफ होते. झालयं तरी काय या सर्वांना? मला वाळीत बिळीत टाकलय की काय आज? मनोहर या विचाराने स्वत:शीच हसला.

नंतरचा पूर्ण दिवस मनोहरशी कोणीच बोललं नाही. कॅन्टिनमधून नेहमी सारखा चहाही नाही. मनोहरने स्वत:हून लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येकजण मनोहर त्यांच्या जगात नसल्यासारखाच वावरत होता. दिवस जसा पुढे सरकायला लागला तसं मनोहरला गरगरायला लागलं. तोंडावर थंड पाणी तरी मारावं असं ठरवून तो वॉश रुम मधे गेला आणि आरशासमोर उभा राहिला.... समोर कुणीच नव्हतं. आरसाही मनोहरच प्रतिबिंब दाखवत नव्हता.

"अरे बाप रे! मी मेलोय की काय?" पाया खालची जमीन सरकल्याचा भास मनोहरला झाला, "पण मेलो असतो, तर सकाळी मनाली ऑफिसला नसती गेली, घरातही गडबड असती आणि इथे ऑफिसात निदान दखलतरी घेतली गेली असती. मग काय घडलं असाव," मनोहर आपल्याच विचारांत बाहेर पडला, गाडीत बसला आणि घरी निघाला. पण घरी जायची इच्छा नव्हती म्हणून मग घरा समोरच्या पार्कमधे थोडा वेळ बसून डोकं शांत कराव असं त्याने ठरवलं.

बेंचवर म्हातारे नेने काका बसले होते. नेने काका म्हणजे अगदी निरुपद्रवी प्राणी. मनोहरला बऱ्याच वर्षांत त्याच्याशी बोलल्याचं आठवत नव्हतं....निदान या नेन्यांना तरी मी दिसतोय का?

"नमस्कार काका? काय म्हणता? कसे आहात?" मनोहरने खडा टाकला.

"मी बराय रे. पण तू का असा मलूल दिसतोयस? बरं नाही का?" आज संपूर्ण दिवसांत प्रथमच मनोहरशी कोणीतरी बोललं होतं.

"म्हणजे मी तुम्हाला दिसतोय काका? मी मेलो नाहीये तर. काका, बाकीच्यांना मी अचानक दिसेनासा झालोय हो."

"हो तर मला दिसतो आहेस ना तू पण बाकीच्यांना दिसत नाहीयेस. मी आणि तू एकाच बोटीत बसलोय रे म्हणून एकमेकांना दिसतोय. नाहीतर काल पर्यंत मी तरी तुला कुठे दिसत होतो?"

"हे असं काय बोलताय? काका खरं सांगा..आपण मेलो आहोत का हो?"

"नाही रे मन्या, अगदी मेलोच आहोत असं नाही म्हणता येणार..पण मी रिटायर झालो आणि या सर्वाला सुरुवात झाली..तुझं कारण काय मला माहित नाही पण एवढं सांगतो, जग रितीने आपण अजून मेलो नाही आहोत...आपण फक्त आपलं अस्तित्व गमावलयं."
--------------

(बाप रे! काय भयंकर गोष्ट बनली आहे. मला वाटत या पेक्षा चांगली लिहिता आली असती. बघू पुढे मागे बदलेन.)

आपण ज्या ज्या वेळी राहती जागा बदलतो, शाळा कॉलेजातून बाहेर पडतो, नोकरी बदलतो, देश सोडतो त्या त्या वेळी आपण आपल अस्तित्व त्या ठिकाणातून पुसून टाकत असतो. कधी कधी माणसाची गरज संपून गेली की त्याच्या अस्तित्वाची दखल घेण्याच कारणच उरत नाही.

माणसाचं अस्तित्व किती परावलंबी आहे, नाही? नुसतं परावलंबी नाही तर तकलादू ही. दुसऱ्याने मान्य केल तर आपल अस्तित्व आहे नाहीतर नाही. लोक ओळखतात म्हणून अस्तित्व आहे, आरसा दाखवतो म्हणून अस्तित्व आहे. माणूस प्रत्येक ठिकाणी आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवू पहात असतो. अगदी लहान मूल रडते ते ही आपण असल्याचा दाखला देत असते. एखादा गुणी कलावंत केवळ लोकांनी दखल घेतली नाही म्हणून काळाच्या पडद्याआड जातो. शौर्याने युद्ध लढलेल्या अनेक सैनिकांचं केवळ नोंद नसल्याने अस्तित्व पुसलं जातं. आपल्या वागण्यातून, कामातून, जगण्यातून आपण आपलं अस्तित्व जगवत असतो.


--साभार....:)

No comments:

Post a Comment